आता एक धक्कादायक बातमी. खापरी पुनर्वसन परिसरात उद्योजकाने स्वतःला कारमध्येच पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या उद्योजकाने पत्नी आणि इंजिनिअर मुलालाही त्याने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यातून बचावले.
आगीत या उद्योजकाचा अक्षरश: कोळसा झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामराज गोपाळकृष्ण भट असे या उद्योजकाचे नाव आहे. आर्थिक तंगी असह्य झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी धावत्या कारलाच पेटवून दिले. यामध्ये पत्नी संगीता आणि मुलगा नंदन हे दोघे जखमी झालेत. वर्धा मार्ग खापरी पुनर्वसन परिसरात काल ही धक्कादायक घटना घडली.
कारला आग लावली. कारने पेट घेतला. काहींना कार पेटल्याची दिसताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबद माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती आणि भट यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पत्नी आणि मुलाने कारमधून उडी मारल्याने ते वाचले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रामराज यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय आहे. ते विविध कंपन्यांना नट-बोल्टचा पुरवठा करत होते. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. आर्थिक कोंडी कशी फोडावी, या चिंतेत ते होते.
वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला काहीतरी पिण्यासाठी दिले. संशय आल्याने त्यांनी ते घेतले नाही. यावेळी त्यांनी काही समजण्यापूर्वीच कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, अशी माहिती पोलिसांनी दिली
