मेळघाटातील कोयलारी-पाचडोंगरी गावातील आदिवासी रुग्णांवर पोलीस बंदोबस्तात उपचार करण्याची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील पाचडोगरी-कोयलारी गावातील नागरिक विहरीतील दूषित पाणी पिल्याने गावात कॉलराची साथ आली आहे. तर यामध्ये चार आदिवासींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
म्हणून पोलीस बंदोबस्तात उपचार
सध्या या आदिवासी बांधवांवर चुरणी, काटकुंभ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पाचडोंगरी येथील जिल्हापरिषद शाळेत तात्पुरता स्वरुपाचे रुग्णालयात उभारण्यात आले आहे. दरम्यान मेळघाटमधील आदिवासी बांधव हे रुग्णालयातील उपचारांपेक्षा भुमका यांच्याकडील उपचाराला पसंती देतात. त्यामुळे दवाखान्यातील उपचार अर्धवट सोडून रुग्ण हे भूमका बाबाकडील उपचार घेण्यासाठी पळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे चक्क पोलीस बंदोबस्तात या आदिवासी रुग्णांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.
पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी या छोट्या गावात नळाद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जात होता. परंतु ग्रामपंचायतीने महावितरणचे विज बिल न भरल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे नागरिक गावाशेजारील असलेल्या एका विहिरीतून पिण्यासाठी पाणी आणत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे गावातील कचरा आणि घाण या विहिरीत गेली आणि तेच पाणी ग्रामस्थ पिल्याने गावात कॉलराची लागण झाली.
जवळपास शंभर रुग्ण कॉलराची साथीने आजारी पडलेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आजारी असलेल्या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान रुग्णालयातील उपचार अर्धवट सोडून आदिवासी हे भूमका बाबाकडे उपचार घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
