अजित पवारांना देहूमधील कार्यक्रमात बोलू न दिल्याने संजय राऊत संतापून म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. याच प्रकरणावरुन आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही या प्रकरणावर भाष्य केलंय. त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनींही पंतप्रधानांवर टीका केली असून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सर्व विषयांमध्ये राजाकरण करण्यावरुन सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलंय.

घडलं काय?
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.

ऊत काय म्हणाले?
याच प्रकरणासंदर्भात सध्या अयोध्येत असणाऱ्या राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. “काहीजण म्हणतील यात कसला अपमान आहे? पण तो महाराष्ट्र राज्याचा अपमानच आहे. या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या सरकारमधल्या प्रमुख नेत्याला बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे,” असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “महाराष्ट्राच्याबाबतीत अशाप्रकारच्या घटना वारंवार घडवल्या जात आहेत, हे मी प्राकर्षाने सांगू इच्छितो. संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करणारा आजचा प्रसंग आहे,” असं राऊत म्हणाले.

यशोमती ठाकूर यांनी केली टीका…
तर यशोमती ठाकूर यांनी, “देशाचं पंतप्रधान पद महत्वाचं असतं त्याचप्रमाणे राज्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदही महत्वाचं असतं. आज मोदींनी केवळ अजित पवारांचा अपमान नाही केलाय तर महाराष्ट्राचा अपमान केलाय,” अशा शब्दांमध्ये या प्रकरणावर भाष्य केलं.

आशिष शेलार म्हणतात प्रत्येक गोष्टीत राजकारण नको
याच संदर्भात बोलताना आशिष शेलार यांनी, “नरेंद्र मोदींनी मोठ्या मनाने आणि दिलखुलासपणे अजित पवारांना तुम्ही भाषण करा असं सांगितलं. त्यावर अजित पवार काय बोलले हे त्यांनाच माहिती. ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा मिठाचा खडा टाकणे योग्य नाही. सुप्रिया सुळेंनी थोडी माहिती घेतली असती तर हे वक्तव्य केलं नसतं असं माझं मत आहे,” असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *