पालघरमध्ये बस पलटी झाल्यामुळं शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भुसावळ – बोईसर मार्गावर हा अपघात झाला. सदर अपघातामध्ये 10 ते 15 जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रातराणी एसटी बसमध्ये असणारा हा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगत प्रवाशांनी संपात व्यक्त केला.
सूत्रांच्या माहितीनुसार या बसचा चालक नाशिकला बदलण्यात आला. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं लक्षात येताच काही प्रवाशांनी ही बाब वाहकांच्या निदर्शनात आणून दिली. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि वाघोबा घाटात हा अपघात झाला.
दरम्यान, सध्या जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता या बस चालक आणि वाहकावर एसटी प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
