सिग्नलला मिळणार दुपारची सुटी

प्रखर उन्हाने नाशिककर हैराण झाले असून, सकाळी साडेअकरानंतर सायंकाळी पाचपर्यंत रस्त्यांवरील वाहतूकही मंदावत आहे. अनेक सिग्नलवर दुचाकीस्वारांना तप्त उन्हाचे चटके असह्य होत असल्याने सिग्नल मोडले जातात, तर अनेक ठिकाणी रस्ताकिनारी वाहनचालक सावली शोधतात. त्यामुळे सिग्नलला दुपारी काही वेळ ‘सुटी’ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

नागपुरात दुपारी बारा ते चार सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून, आता नाशिकमध्येही त्यासंदर्भातील सर्वेक्षण वाहतूक विभागाने सुरू केले आहे. शहरात यावर्षी उकाडा सर्वाधिक असून, तापमान पुन्हा चाळिशी गाठण्याची शक्यता आहे. शहरात ५० सिग्नल असून, काही दिवसांपासून दुपारी प्रखर उन्हात वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याचे दिसत आहे. महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, आयटीआय, सीबीएस, शरणपूर, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका या मध्यवर्ती सिग्नलच्या भागात झाडे अथवा दुकानांच्या सावलीत दुचाकीस्वार थांबतात. अनेक जण सिग्नल तोडून पुढे जातात. हा नियमभंग असला, तरी उन्हात वाहतूक पोलिसांनाही त्रास होत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. अशाच कारणांमुळे नागपूरमध्ये १६४ सिग्नलपैकी २१ सिग्नल दुपारी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. या सिग्नलचे सर्वेक्षण करून तेथील उपायुक्तांनी हा आदेश निर्मगित केला. त्यानुसार नाशिकमध्येही वाहतूक विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. सिग्नलची वेळ, दुपारची गर्दी, वाहनांच्या रांगा आणि एकूणच तेथील गरज ओळखून सिग्नल बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थात, सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पोलिस आयुक्तांना अहवाल सादर होईल. त्यानंतर अंतिम निर्णय लागू होईल. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत सिग्नल तात्पुरते बंद ठेवून दुचाकीस्वारांना दिलासा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
वाहनचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहोत. पण, वाहतुकीच्या नियमांतून सूट नसेल. नियमांतच वाहतूक सुरळीत ठेवण्यात येईल. काही वेळ सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याबाबत सर्वेक्षण सुरू आहे.
सीताराम गायकवाड, सहाय्यक आयुक्त, वाहतूक शाखा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *