बदामाच्या दरांत चढउतार

आयात विस्कळीत झाल्यामुळे महिनाभरापासून बदामाच्या दरात सातत्याने चढउतार बघायला मिळत आहे. गत काही दिवसांपासून दरांत दहा ते वीस रुपयांनी चढउतार होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ७४० रुपये किलो असलेले बदाम या आठवड्यात मात्र वीस रुपयांनी घसरून ७२० रुपये किलो झाले आहे. मात्र त्यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

बदामाची सुमारे ५० टक्के आयात ही अमेरिकेहून होते. परंतु काही कारणास्तव येथील आयात प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. बदामचा दर सातत्याने कमी-जास्त होत आहेत. बाजारपेठेत बदामाचे दर अस्थिर असले तरीही इतर सुका मेवा मात्र स्थिर आहे. लवकरच आयात स्थिर होऊन दर स्थिरावतील असेही सांगितले जात आहे. उन्हामुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्याने भाज्यांच्याही दरांत किरकोळ वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हामुळे लिंबूला कधी नव्हे तो दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचला. मात्र आता लिंबाची आवक वाढली आहे, त्यामुळे दरही स्थिर होण्याची शक्यता आहे.

टोमॅटो, काकडी, बटाटा महाग

स्थानिक बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. याचबरोबर उन्हाळ्यामुळे काकडीला तर वाळवण करण्यासाठी बटाट्यांनाही मागणी वाढली आहे. स्थानिक बाजारात बटाटा ३० रुपये तर काकडी ४० रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.

खाद्यतेल स्थिर

युक्रेन-रशिया युद्धामुळे खाद्यतेलाच्या आयात आणि निर्यातीवरही परिणाम झाला. या सगळ्या प्रकारामुळे इंडोनेशिया आणि मलेशियाने तेलाचे दर वाढविल्याने आपल्याकडे त्याचा मोठा परिणाम जाणवला. सद्यस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांचे दर दुपटीने वाढले आहेत. मात्र, गत दोन आठवड्यांपासून दर स्थिर आहे.

कैरी दाखल

हंगाम सुरू झाल्याने अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात आंबा स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाला. त्याचबरोबर आंब्यासह कैरीही बाजारात दाखल आली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे आवक घटल्याने दरांत प्रचंड वाढ नोंदविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *