झोपडीवासीयांचा २७ एप्रिलला मोर्चा

मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो झोपडीवासींना घराचा अधिकार मिळावा, यासाठी ‘घर हक्क संघर्ष समन्वय समिती’च्या बॅनरखाली हजारो झोपडीवासींचा मोर्चा येत्या २७ एप्रिल रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. समितीच्या बॅनरखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी घरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना एकवटल्या आहेत. नवी मुंबईतील हजारो झोपडीवासी या मोर्चात सामील होणार असल्याची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याची घोषणा करून एक तप उलटले तरी सरकारकडे कोणताही अद्ययावत सर्वेक्षण अहवाल नाही. मात्र तरीही मनमानी पद्धतीने तोडक कारवाई करून सरसकट सर्वच झोपडीधारकांना बेघर केले जाते. झोपडीवासींना वीज, पाणी, शौचालये आदी मानवी सुखसोयींपासून वंचित ठेवले जाते. सरकारने झोपडीवासींसाठी घोषित केलेल्या कोणत्याही योजना पूर्ण केल्या जात नाहीत. मात्र सर्व कायदे बासनात गुंडाळून त्यांना बेघर केले जाते आणि पुनर्वसनही नीट केले जात नाही. झोपडीधारकांकडील पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत, असा आरोप समितीतर्फे करण्यात आला. त्यामुळे सरकारने सर्वेक्षण पूर्ण करावे आणि अंतिम मुदत जाहीर करावी, अशी मागणी समितीचे मुख्य निमंत्रक हिरामण पगार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *