ठाणे सत्र न्यायालयाचा गणेश नाईक यांना धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला

 ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांना धक्का दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. नवी मुंबईतील एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आक्रमक आंदोलने केली आहेत. मागील ४ दिवसांपासून गणेश नाईक फरार आहेत. दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र नाईकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.
गणेश नाईक नॉट रिचेबल, पोलिसांकडून शोध सुरु
नवी मुंबईतील एका महिलेने गणेश नाईक यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत बेलापूर आणि नेरुळमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गणेश नाईक हे अद्याप फरार आहेत. गेल्या ६ दिवसांपासून गणेश नाईक यांचा फोन नॉट रिचेबल आहे. गणेश नाईक यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. कोपरखैरणे येथील घर आणि कार्यालय तसेच मुरबाडमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून नाईक यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. अटक होण्यापूर्वी गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
पुढील सुनावणी २७ एप्रिलला
गणेश नाईक यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी दरम्यान फिर्यादीचे वकील आणि सरकारी वकीलामध्ये युक्तिवाद झाला. या युक्तीवादादरम्यान पीडित फिर्यादीच्या वकिलांनी आपली बाजू मांडत बंदूक दाखवणे हा खूप मोठा गुन्हा असून यावर अंतरिम जमीन मिळू नये अशी मागणी केली. योग्य युक्तिवादासोबत योग्य कागदपत्रे सादर केल्यावर दोन्ही अर्जावर सुनावणी करण्यात येणार आहे. दरम्यान सरकारी वकिल आणि तपास अधिकारीचा जबाव नोंदवल्यावर पुढचा निर्णय देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी आहे.
‘जामीन दिला तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो’
दरम्यान फिर्यादी महिलेने आपल्या जीविताला धोका असल्याचे माध्यमांशी बोलताना, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून माझ्यावर अन्याय झाला आहे. मी आवाज उठवलाय, मला लोकांची साथ हवी आहे, न्यायालयाने जर आरोपीला जामीन दिला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, मला सुरक्षा पाहिजे, अशी मागणी पीडितेने वकिलांच्या माध्यमातून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *