अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ आरोपींना फाशीची शिक्षा; ११ जणांना आजन्म कारावास

२००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

न्यायाधीश ए आर पटेल यांनी ८ फेब्रुवारीला सर्व निर्णय देताना सर्व ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. कोर्टाने ७७ पैकी २८ आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या ४९ आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार कोर्टाने आज निर्णय दिला असून ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

२००८ मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते. २६ जुलै २००८ रोजी हे बॉम्बस्फोट झाले होते. २६ जुलै २००८ ला झालेल्या २१ साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.

२ फेब्रुवारीला येणारा निकाल टळला

याआधी २ फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल येणार होता. पण न्यायमूर्ती ए आर पटेल यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे ८ फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सर्वांना दोषी ठरवण्यात आलं.

२६ जुलै २००८ रोजी फक्त एका तासात २१ बॉम्बस्फोट झाले होते. अहमदाबाद पोलिसांनी याप्रकरणी २० तर सूरत पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना तात्काळ सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *