राउरकेला येथून जम्मू तवी येथे जाणा-या मुरी एक्स्प्रेसचे १० डबे सोमवारी रुळावरून घसरले. या अपघातात चार प्रवासी ठार झाले असून १०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी विजयकुमार यांनी मृतांची आणि जखमींची अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलाहाबादपासून ४० किलोमीटर अंतरावरील कोशांबी जिल्ह्यातील सिराथूच्या अठसरायजवळ हा रेल्वे अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिकांच्या सहकार्याने प्रशासन मदतकार्याला लागले आहे.
दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सुचना संबंधित रुग्णालयांना दिल्या आहेत. सिन्हा सकाळी गाजीपूरमध्ये होते, अपघाताचे वृत्त समजताच ते देखील घटनास्थळी रवाना झाले. मुगलसराय आणि अलाहाबाद येथून मदत पथक रवाना करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनीही मदत कार्य सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
शासनातर्फे अलाहाबाद येथे ०५३२१०७२ आणि कानपुर येथे ०५१२१०७२ या दुरध्वनीवर तातडीची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
दिल्ली-हावडा अप-डाऊन आणि मुगलसराय, फतेहपुर आणि कानपुरला जाणा-या गाड्या अन्य रेल्वे स्थानकातच थांबवल्या आहेत.
यापुर्वी, आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात शनिवारी एका पॅसेंजर रेल्वेचे पाच डबे आणि इंजिन रुळावरुन घसरले. नदीच्या पुलावरुन जात असताना हा अपघात झाला आणि डबे खाली कोसळले.