मराठवाडा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दुष्काळ, बेरोजगारी आणि पाणी टंचाई समोर येते. त्यात मराठवाड्यात कोणतेही उद्योग नसल्याने येथील तरुणांना नोकरीसाठी मुंबई, पुण्याशिवाय पर्याय नसतो. दुष्काळ तर मराठवाड्याच्या पाचवीला पुजल्यासारखा आहे, त्यामुळं शेती करणे म्हणजे आत्महत्या केल्यासारखेच आहे, अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे. मराठवाड्यातील तरुणांसमोर शेती, बेरोजगारी आणि त्यात लग्न करण्यास मुली कोणीही देत नसल्याने नैराश्यात जात असल्याचे भयावह चित्र सध्या दिसतेय.
ग्रामीण भागात असणाऱ्या मुलींना आपला जोडीदार मात्र खेडयातला तरुण शेतकरी नको, अशी परिस्थिती असल्याचे गावातील तरुण सांगतात. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय नुकसानीचा झालाय. त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. त्यामुळे गावगाडयातल्या मुलीला शेतकरी नवरा नकोसा झालाय. आपला नवरा एखाद्या कंपनीत कमी पगारात काम करत असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे, अशी मुलींची आणि पालकांची मानसिकता बनत चालली असल्याचे चित्र आहे.
मराठवाड्यात सतत येणारे शेतीवरचं अस्मानी संकट, शेतीमालाचे घसरलेले दर आदी कारणांमुळे गावगाडा ठप्प होतोय. यामुळे छोटा शेतकरी नव्हे, तर अगदी मोठा शेतकरीही अडचणीत येतोय. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठया प्रमाणावर बेरोजगार होतोय. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागलेत. त्यामुळे खेडयापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनत चालली आहे. दुष्काळी नव्हे, तर बागायती भागातही तरुणांची परवड होते आहे. आज अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन नोकरीअभावी गावातच खितपत पडत आहेत. एक ना एक दिवस आपल्याला नोकरी लागेल, आपण शहरी बाबू बनू अशी त्यांना खात्री आहे. त्यांना शेती करणं कमीपणाचं वाटतं. इतकं शिकून परत मातीतच राबायचं तर शिकायचं कशाला? अशी त्यांची मानसिकता बनत चाललीय.
मराठवाडयात सततचा दुष्काळ, द्रारिद्रय आणि बेरोजगारी यामुळे अनेक तरुणांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. आजच्या घडीला असंख्य ग्रामीण तरुणांना नोकरी मिळत नाही. अनेक युवक आपला अमूल्य वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करताहेत. परंतु एवढं शिकूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुणांमधील व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय. काही तर नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आहेत. रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी जाणारे नागरिकही मराठवाड्यातीलच आढळून येतात.
