संपूर्ण जगात मागील दोन वर्षांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना महामारीची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र या कालावधीत अनेकांना आपले जीवलग गमावावे लागले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकजण रस्त्यावर आले. कित्येक बालकांचे मातृ-पितृ छत्र हरपले. कित्येकांचा आधार हरपला. राज्यात आता करोना महामारीची दुसरी लाट ओसरल्यात जमा आहे आणि जनजवीन पूर्वपदारवर येत आहे. दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आज करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या कुटुंबियांसाठी काहीसा दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना राज्य शासन ५० हजार रुपयांची मदत करणार आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे.
“करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमीत करण्यात आला आहे.” असं ट्विट वडेट्टीवार यांनी केलं आहे
तसेच, “मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नातेईवाईक राज्य शासना द्वारे विकसित करण्यात येत असलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन, किंवा सेतू केंद्रात, ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.” अशी माहिती देखील वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
आरटीपीसीआर/ मॉलेक्युलर टेस्ट/आरएटी या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररूग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे क्लिनिकल डायग्नोसिस कोविड -19 असे झाले होते, त्याच व्यक्तीचे प्रकरण करोना मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.
.
