शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर सध्या ईडीच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर अर्जुन खोतकर यांनी स्पष्टीकरण देखील दिल्यानंतर काही दिवसांतच ईडीनं अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीचे काही मंत्री आणि नेत्यांवर ईडीनं छापेमारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये आता अर्जुन खोतकर यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.
ईडीचं पथक शुक्रवारी सकाळीच अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातल्या निवासस्थानी पोहोचलं. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला छापा थेट मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरूच होता. यादरम्यान, ईडीनं सखोल तपास केला असून आज देखील ही चौकशी सुरू असणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, छापा पडला, तेव्हा अर्जुन खोतकर घरीच असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित दोन उद्योजकांवर ईडीनं छापे टाकले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केलं होतं.
हा कारखाना अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय जुगलकिशोर तापडिया यांना कागदोपत्री विक्री करण्यात आला. पण त्यासाठी देण्यात आलेली रक्कम अर्जुन शुगर्समधून देण्यात आली होती. जुगलकिशोर तापडिया यांनी त्यांच्या व्यवहारविषयक कागदपत्रात तसे मान्य केले आहे. १९८४ मध्ये जालना कारखाना उभारण्यात आला होता. दहा हजार सभासद असणाऱ्या या कारखान्याची मोठी जमीन असल्याने त्याच्या विक्रीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता. लातूर येथील माणिकराव जाधव यांनी या प्रकरणात पहिली तक्रार केली होती.
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घरावर ईडीचा छापा; सोमय्यांनी केलेला १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
अण्णा हजारे, मेधा पाटककर यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. पण अलिकडेच हे प्रकरण भाजपने उचलले आहे. या अनुषंगाने तापडिया आणि त्यानंतर पद्माकर मुळे यांनी हा कारखाना खरेदी केला. त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी आता अंमलबजावणी संचालनालयाकडून केली जात आहे.
अर्जुन खोतकर यांचा आरोपांवर खुलासा
खोतकर यांनी सोमय्यांचे आरोप बेछूट आणि पुराव्यांशिवाय असल्याचा खुलासा केला होता. मूल्यांकन करणाऱ्यांशी संगनमत करून कारखान्याच्या जमिनीची आरक्षित किंमत केल्याच्या सोमय्या यांच्या आरोपाचा खोतकर यांनी इन्कार करून शासनाची बँकेकडे गहाण असलेली जमीन लाटल्याच्या केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले होते. सोमय्या यांचा बोलविता धनी वेगळाच असून यामागे राजकारण अ्सल्याचे खोतकर यांनी म्हटले होते.
