राज्याचे मुख्यमंत्री थापा मारत आहेत अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरेंवरी टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही.
‘सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना कोणीच विचारत नाही तसंच जैतापूर प्रकल्प बंद करण्याची भाषा करणारी शिवसेना मागे पडली आहे. शिवसेनेला डावलून भाजपकडून वेगळ्या विदर्भाची तयारी सुरु आहे,’ असंही राणे म्हणाले.
दुष्काळावर उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत असून 5 महिन्यांपासून टँकरची बिलं दिली नसल्याचाही आरोप त्यांनी केला. ‘चारा छावण्या उभारण्यासाठी कोणी पुढाकार घेताना दिसत नाही’ या शब्दांत राणेंनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. ठाण्यात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणे बोलत होते.
राणेंनी नेहमीप्रमाणे काँग्रेसलाही घरचा आहेर दिला. ‘आंदोलन करण्यासाठी काँग्रेसकडे खूप विषय आहेत. जर आंदोलनासाठी कुणी मोठा नेता नाही आला तर मला बोलवा’ अशी शेलकी टीका करत राणेंनी स्वतःच्याच पक्षाला चिमटे काढण्याचा प्रयत्न केला.

