राज्यात दुष्काळामुळे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, ऑगस्ट महिना संपायला आला असली तरी राज्यात १०० टक्के पेरण्यापूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.
राज्यात अनेक ठिकाणी २५ टक्के पाऊस झालेला आहे. जळगाव जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी असा पाऊस अजूनही झालेला नाही, ज्यामुळे नदी, नाले वाहून निघतील, यामुळे धरणांमध्ये पाणीसाठाही फारच कमी शिल्लक राहिलेला आहे.
राज्याच्या सर्वच भागात तुरळक पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा विभागात पाणी टंचाई जाणवत आहे.
राज्यात आजपर्यंत 497 मि.मी. पाऊस झाला असून तो 861 या सरासरीच्या 57.7 टक्के आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जलाशयातील सर्व प्रकल्पांत 48 टक्के एवढा साठा आहे.
राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे-नागपूर व अमरावती जिल्ह्यात 100 टक्के पेक्षा अधिक पाऊस झाला असून नंदूरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा या सहा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.
खरीप ज्वारी व बाजरी पिके पोटरी अवस्थेत, मका व तूर पिके वाढीच्या तर उडिद, मुग व सोयाबीन पिके फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. कापूस पिक पाते धरणे ते फुलोरा अवस्थेत आहेत. पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे.
खरीपासाठी हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील 3 वर्षांची सरासरी आणि बियाणे बदल यानुसार पिकनिहाय बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. खरीपाकरिता 16.64 लाख क्विंटल बियाण्यांची गरज होती, त्या तुलनेत 17.11 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. दि. 21 ऑगस्ट अखेर 14.99 लाख क्विंटल (90 टक्के) इतका बियाणे पुरवठा झाला आहे.
एकोणिसशे गावांना टँकरने पाणी पुरवठा
राज्यातील 1501 गावे आणि 2677 वाड्यांना आजमितीस 1901 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास 1524 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.

