महाडमधील पन्नास गावांना जोडणारा पुल धोकादायक स्थितीत

सावित्री नदीचा पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा धडा अद्याप महाडमधील यंत्रणेने घेतलेला दिसत नाही. महाडमधील पन्नास गावांना जोडणाऱ्या दादली पुल हा तीन दिवसांपूर्वी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे धोकादायक स्थितीत आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेले लोखंडी कठडे उन्मळून पडले आहेत. पुलावर असलेला रस्ता खचला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लोक पुलावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालतात किंवा प्रवास करतात.
या पुलाने महाडच्या अन्य ५० गावांशी संपर्क जोडला आहे. सावित्री नदीवर असणाऱ्या या छोट्या पुलाचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. ते काम तकलादू असल्याचे गावकरी सांगतात. पावसाच्या रौद्ररूपानंतर हा पूल उखडला आहे. येथे राहणारे स्थानिक रहिवासी केदार पाटील सांगतात. इथून बस, ट्रक गेला तर बाजूने चालणाऱ्यांना कंपने जाणवतात. गावांना जोडणारा दादली पूल हा रहदारीचा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाचे ऑडिट करून, दुरुस्ती करणे आवश्यक आहे, याकडे स्थानिक लक्ष वेधतात.

शिरगावमधील दशरथ पाटील सांगतात, दोन महिन्यांत रस्ता पुन्हा खचल्यासारखा दिसत असेल, त्यावर खड्डे पडत असतील तर या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तर सावित्री नदीवरचा पुल वाहून गेल्याने दुर्घटनेची सल अजून महाडवासीयांच्या मनात अजून आहे, असे तिथले स्थानिक सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *