राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यात हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानं पूराचं पाणी ओसरत असून, हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. दरम्यान, पूरग्रस्त जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, आज (२७ जुलै) आणि उद्या (२८ जुलै) पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
