लोक आहेत, पण नोकरी नाही, ‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही -मनसे

देशात करोनाच्या महामारीमुळे अभूतपूर्व परिस्थितीने डोकं वर काढलं आहे. पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर थैमान दुसऱ्या लाटेनं घातलं असून, देशात आणि राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांनाही हालअपेष्टा सोसोव्या लागत आहे. बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे कडक निर्बंधांमुळे हाल होऊ लागले आहेत. याच विदारक परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत देश आणि राज्यात नुसता गोंधळ सुरू असल्याचं अधोरेखित केलं आहे. “लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहेत, पण औषध नाही. व्यापारी आहेत, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातलं नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

महाराष्ट्रासह देशातील स्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात दररोज ५० ते ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण झालेलं आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत असून, राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, महाराष्ट्रात वाढलेल्या मृतांच्या संख्येमुळे चिंता कायम आहे. दुसरीकडे देशातील परिस्थितीही हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. राजधानी दिल्लीत दररोज ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. उत्तर प्रदेशातही परिस्थिती चिंताजनक असून, देशात दररोज साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *