ONGCच्या तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण; कंपनीच्या गाडीतून पळवलं

नैसर्गिक वायू आणि तेल कंपनी अर्थात ONGCच्या तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात असलेल्या लकुआ क्षेत्रातील रिंग साईटवरून कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं असून, उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांनी हे कृत्य केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. ज्या गाडीतून कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आली, ती सापडली असून, कर्मचाऱ्यांचा उद्याप शोध घेतला जात आहे.

ONGCच्या ट्विटर हॅण्डलवर काही ट्विट्सच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. दोन कनिष्ठ सहायक अभियंते आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अशा तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. शिवसागर जिल्ह्यातील (आसाम) लकुआ येथील रिंग साईटवर २१ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याचं कंपनी व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

अज्ञात बंडखोरांनी कर्मचाऱ्यांचं अपहरण करताना ONGCच्या गाडीचा वापर केला. ही गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली. याप्रकरणी ONGC प्रशासनानं स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *