ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत असत. किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केलं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा नाटकांमधून काम केलं. १९८० च्या सुमारास ते दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते.
किशोर यांनी आत्तापर्यंत साधारण ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. ‘नाना करते प्यार’ हे त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरील शेवटचं नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली, कुंकू हसलं’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ‘जिस देश मे गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘हलचल’,’सिंघम’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. भूमिका छोट्या असल्या तरी या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
किशोर हे हृदयविकार तसंच मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची बायपासही झाली होती.

