राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारला देखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेवरून पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. मात्र, करोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला असून येत्या काही तासांत त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील इतर बोर्डांकडून देखील अशा प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आले आहेत. याआधी ICSE आणि CBSE या दोन बोर्डांनी देखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर अखेर राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करावं, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, असं देखील राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *