करोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना अनामत रक्कम घेऊन नये असे आदेश असतानाही मंगळवारी (दि.१३) रोजी शकुंतला गोडसे यांना उपचाराकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केले तेव्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने १ लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यांच्या मुलगा विलास गोडसे व पुतण्याने तातडीने ३५ हजार भरून उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन दिवस उपचार केल्यानंतर गोडसे यांचे निधन झाले. त्यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातील ३ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर हॉस्पिटल प्रशासनाने गोडसे यांच्या हातावर सूज आल्याने बांगड्या काढून ठेवल्याचे सांगितले.
कुटुंबीयांनी गोडसे यांच्या अंत्यसंस्कारानंतर शनिवारी हॉस्पिटलमध्ये बांगड्यांबाबत चौकशी केली असता प्रथम रुग्णालयाने माहिती नसल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली असता बाचाबाची झाली. त्यानंतर ‘तुमच्याकडे बिलाचे ४० हजार रुपये बाकी असल्याने बांगड्या काढून ठेवल्या आहेत’, असे तेथील एका महिला डॉक्टरने सांगतले. दरम्यान दवाखान्याच्या व्यवस्थापनाकडून सायंकाळी गोडसे परिवाराला बोलावून बांगड्या सुरक्षित असून, उर्वरित बिल भरण्याचे सांगण्यात आले. परंतु, हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने आईचे निधन झाले, अशी तक्रार विलास गोडसे यांनी शनिवारी रात्री देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दिली. मात्र हॉस्पिटलचे संचालक डॉ. युवराज मुठाळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.