वेळ पहाटे तीनची. पोलीस गस्त सुरू असताना एका जीपला थांबण्याचा इशारा देऊनही ती थांबली नाही. त्यात ‘वाचवा वाचवा’ असा आवाज आल्याने ओतूर पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला आणि मुंबईतील बोरीवली येथून अपहरण करून आणलेल्या एका तरुणाची सुटका केली.
संप्रित रामसेवक रवी असे सुटका केलेल्याचे नाव असून, चारचाकी गाडीसह चार जणांना अटक करण्यात ओतूर पोलिसांना यश आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.
हसन इस्माईल शेख (वय २५, रा. इंदापूर, ता. वाशी), राजू लक्ष्मण माने (वय २६, रा. शिवशंकरनगर, भूम), कृष्णा पंडित दिसले (वय १९, रा. आष्टावाडी, ता. भूम) , विशाल निवृत्ती जाधवर (वय २६, रा. वडजी, ता. वाशी) असे उस्मानाबाद जिल्ह्यातील अटक केलेल्या चार जणांजी नावे आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग २२२ नगर-कल्याण महामार्गावर आज (२४ मे) पहाटे नाकाबंदी सुरू होती. सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पीएसआय बजरंग बाडीवाल, पोलीस गजानन खत्री, प्रल्हाद आव्हाड, शैलेश लोखंडे, शरद लोखंडे, ग्रामसुरक्षा दलाचे विवेक हांडे, शेखर तांबे हे पथक ओतूर येथे मोनिका चौकात तैनात होते. पहाटे तीनच्या सुमारास जीप (एम.एच.२५, आर.२७५७) आली असता, पोलिसांनी तिला थांबण्याचा इशारा केला. मात्र, गाडी न थांबताच अतिवेगाने पुढे गेली. तसेच गाडीतून बचाव, बचाव असा आवाज आला. त्यामुळे पोलीस गाडी व एका दुचाकीने त्या गाडीचा पाठलाग केला. दुचाकी ओतूर बसस्थानकाजवळ त्या गाडीला आडवी घातली. तसेच पोलीस गाडीने दाबली. त्यामुळे ती गाडी थांबली. या गाडीत पाच जण होते. पैकी एका तरुणाने माझे अपहरण करून बळजबरीने मला मुंबई बोरवली येथून पळवून आणले आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर गाडीसह सर्वांना ताब्यात घेतले.