राज्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत जात असल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. जिल्ह्यात औषधे दुकान वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच कोविड 19 च्या तपासणी पथकात वाढ केली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांची तात्काळ कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शहरात महत्वाच्या तीन ठिकाणी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच मोबाईल पथकही कार्यरत आहे. रेल्वे स्टेशन येथेही कोविड पथक नेमण्यात आले आहे.
राज्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 72 तासांपूर्वीचे RT- PCR Test बंधनकारक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काल 515 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापलेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15075 वर पोहोचली आहे. काल 167 कोरोनाचे रुग्ण बरे झाले. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेने कोविड-19च्या तपासणी पथकात वाढ केली आहे. ही पथके शहरात शुक्रवारपासून सर्वत्र कार्यरत झाली आहेत.