मुंबईत कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक, लोकांचा प्रचंड संताप

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत  कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली लसीकरण  मोहीम थांबविण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. कोरोना लसीचा तुटवडा असल्याने मुंबईतील अनेक कोविड लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. सकाळपासून ज्येष्ठांसह नगारिकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, लस संपल्याने लसीकरण मोहीम सध्या थांबविण्यात आली आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून पुन्हा लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये केवळ 160 लसीचे डोस शिल्लक होते. बिकेसी लसीकरण केंद्रात 160 लोकांना आत सोडले तर बाकी लोक रांगेत बाहेर उभे होते. त्यांना स्टॉक शिल्लक नसल्याचं  सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनेक ज्येष्ठ नागरिकही बाहेर रांगेत ताटकळत होते. काहीनी संताप व्यक्त केल्यानंतर सूचना लावण्यात आली की, साठा शिल्लक नाही. त्यामुळे लोकांचा प्रचंड संताप झालेला पाहायला मिळाला.

बिकेसी लसीकरण केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं, महाराष्ट्रातली पहिली लस इथेच दिली गेली होती. तसेच मोहीम येथील महिला स्पेशल लसीकरण केंद्रातला साठा संपला आहे. ८ मार्च महिला दिनी हे सेंटर सुरु करण्यात आलं होते. तर धारावी लसीकरण केंद्रातही लसींचा साठा संपण्याच्याच मार्गावर आहे. केवळ 170 डोस शिल्लक होते. लसीचा पुरेसा साठा नसल्यानं अनेक ठिकाणी लसीकरण थांबवण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली आहे. आज संध्याकाळपर्यंत मुंबईसाठी 1 लाख 46 हजार डोस पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटमधून येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *