नालासोपारा शहरातील हत्यांचे सत्र सुरूच असून एकाच महिन्यात तब्बल ७ जणांच्या हत्या झाल्या आहेत. यातील ३ हत्या या चोरीच्या उद्देशाने, २ हत्या किरकोळ वादातून आणि एक हत्या कौटुंबिक वादातून झाल्या आहेत.
नालासोपारा शहरातील गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. एकाच महिन्यात शहरातील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७ हत्या झाल्या आहेत, तर तीन महिन्यांत १० हत्या झाल्या आहेत.
यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. होळीच्या दिवशी एका रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला काही टोळ्यांनी क्षुल्लक वादातून मारहाण केली होती. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. यामुळे हत्या झालेल्यांची संख्या ७ झाली आहे. एकाच महिन्यात ७ हत्या होणारे तुळींज हे पहिले आणि एकमेव पोलीस ठाणे आहे.
