आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यातील विनोद पिल्लई (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (एक ऑगस्ट) घडली, तर विनोद यांची पत्नी सिरजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय १९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) या दोघींचा वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.
अजमेरा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी येथील एकाच कुटुंबातील तीन जणांनी शुक्रवारी मध्यरात्री विषारी औषध पेटत्या कोळशावर टाकून त्याचा धूर केला. हा विषारी धूर शरीरात गेल्याने विनोद, सिरजा आणि पौर्णिमा बेशुद्ध झाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पित्याचा जागीच अंत, मायलेकी उपचारादरम्यान मृत
बेशुद्ध अवस्थेतील या तिघांनाही वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, विनोद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सिरजा आणि पूर्णिमा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शेवटच्या चिठ्ठीत कारण समोर
आयुष्य संपवण्यापूर्वी विनोद यांनी शेवटची नोट लिहिली होती. त्यामध्ये आपण सर्व जण स्वखुशीने पाऊल उचलत असल्याचे म्हटले होते. आर्थिक विवंचनेतून हे कृत्य करीत असलो, तरी यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असेही त्या चिठ्ठीत म्हटले होते. ते तिघेही उच्चशिक्षित होते. त्यांना त्रास देऊन कोणी जीवन संपवण्यास प्रवृत्त केले का, याचा तपास पोलिस करीत आहेत. मयत तिघांचेही मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. टोकाचं पाऊल उचलण्यासाठी त्यांनी ऑनलाइन शोध घेतला होता काय, याचाही तपास संत तुकारामनगर पोलिस करीत आहेत.
ऑनलाईन औषध मागवलं
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना अखेरची नोट, विषारी औषधाची बाटली आढळली. एका भांड्यात जळालेला कोळसा मिळून आला. विनोद यांनी एक जूनला सोडियम नायट्रेट हे विषारी औषध ऑनलाइन मागवले होते. हे औषध सुरक्षा व सरकारी नियमांमुळे, तसेच घातक श्रेणीत येत असल्याने अशा रसायनाची विक्री ग्राहकांसाठी ऑनलाइन प्लॅटफाॅर्मवर प्रतिबंधित किंवा मर्यादित असते.
उच्चशिक्षित कुटुंब
मृत विनोद यांनी ‘आयआयएम, अहमदाबाद’ येथून ‘मास्टर्स इन कंप्युटर सायन्स’चे शिक्षण पूर्ण केले होते. मुलगी पौर्णिमाही कंप्युटर सायन्सचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. आई सिरजा नामांकित शाळेत समन्वयक म्हणून काम पाहत होत्या. विनोद नोव्हेंबर २०२४ पर्यंत डॉन बॉस्को या कंपनीत कामाला होते. पिल्लई कुटुंबीय नेहरूनगरमध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांनी आर्थिक विवंचनेतून आपले राहते घर विकले.
