मृत्यूछायेत निवारा! मुंबई महानगर प्रदेशात 8014 इमारती धोकादायक; कोणत्या परिसरात धोका अधिक?

 मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) धोकादायक इमारतींचे वास्तव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या आठ महापालिका क्षेत्रांमध्ये एकूण ७,८४० धोकादायक इमारती आढळल्या आहेत. त्यापैकी ७६५ आणि मुंबईतील १७४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असूनही हजारो कुटुंबे मृत्यूच्या सावटाखाली राहत आहेत.

भिवंडीतील बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून गुरुवारी १० जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी सन २०२०मध्ये पटेल कंपाऊंडमधील जिलानी इमारत दुर्घटनेत ३८ जणांनी प्राण गमावले होते.
ढिगाऱ्याखालून बाहेर पडणारे मृतदेह, आपल्या माणसांच्या शोधात रात्रभर थांबलेले नातेवाईक आणि प्रत्येक दुर्घटनेनंतर होणाऱ्या कारवाईच्या घोषणा हे या भागांचे पावसाळी वास्तव बनले आहे. तरीही हजारो नागरिक आजही अतिधोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहत असून, पुढची दुर्घटना कुठे घडेल, याचीच भीती त्यांना सतावत आहे. प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो; मात्र दुर्घटनेनंतरच्या घोषणा, नोटिसा आणि कारवाई यापलीकडे ठोस उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.

महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींच्या याद्या जाहीर करतात. नोटिसा बजावणे, वीज-पाणीपुरवठा खंडित करणे, इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देणे आणि काही ठिकाणी पाडकाम करणे, अशी कारवाई केली जाते. मात्र, पुनर्वसनाचा प्रश्न, पागडी पद्धतीतील भाडेकरूंचे हक्क, न्यायालयीन वाद आणि नागरिकांचा विरोध यामुळे इमारती रिक्त करता येत नाहीत. त्यामुळे जीवितहानीचा धोका कायम आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४,४३७ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी ९७ इमारती अतिधोकादायक आहेत. नौपाडा-कोपरी विभागातच ५१ अतिधोकादायक इमारती असल्याने हा परिसर सर्वाधिक संवेदनशील मानला जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ७१६ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २२५ अतिधोकादायक आहेत. ‘एमएमआर’मध्ये अतिधोकादायक इमारतींची सर्वाधिक संख्या याच महापालिका क्षेत्रात नोंदली गेली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५०४ धोकादायक इमारती असून, ५२ अतिधोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी काही भागांत पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली होती. मिरा-भाईंदरमध्ये ४५३ धोकादायक इमारती असून, ३८ अतिधोकादायक आहेत. मुदतीत इमारती रिकाम्या न केल्यास त्या पाडून खर्च संबंधित सोसायट्यांकडून वसूल करण्याचा इशारा दिला आहे.

भिवंडीत धोका मोठा
भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात १,३०९ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २०५ इमारती ‘सी-१’ श्रेणीत आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा आकडा १,७००च्या पुढे गेल्याची नोंद आहे.

वसई-विरार, पनवेलमध्ये कारवाईचा इशारा
वसई- विरारमध्ये ७४ अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यापैकी १९ इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे. पनवेलमध्ये ६४ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्या रिकाम्या न केल्यास वीज-पाणीपुरवठा खंडित करून पोलिस बंदोबस्तात निष्कासनाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. एमएमआर’मधील धोकादायक इमारतींचा प्रश्न केवळ बांधकाम सुरक्षेपुरता नाही. तो पुनर्वसन, नागरी हक्क, प्रशासनाची अंमलबजावणी क्षमता आणि सुरक्षिततेशी थेट जोडला गेला आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी याद्या जाहीर करून न थांबता, पुनर्वसनासह वेगवान आणि ठोस कारवाईची गरज आहे.

उल्हासनगरात १४४ इमारतींचे ऑडिट प्रलंबित
उल्हासनगरमध्ये २८३ धोकादायक इमारती असून, सहा इमारती अतिधोकादायक आहेत. मात्र, शहरातील १४४हून अधिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात धोकादायक इमारतींची संख्या महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत १७४ इमारती अतिधोकादायक
मुंबई : मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबईत एकूण १७४ इमारती अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या घोषित केल्या होत्या. त्यामध्ये १४१ खासगी इमारतींचा समावेश आहे. यापैकी एकूण ३२ इमारती शहरातील, ८० पश्चिम उपनगरांतील आणि २९ पूर्व उपनगरांतील आहेत. या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी सूचना आणि आवाहन करण्यात आले आहे. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील, असे महापालिकेकडून आधीच स्पष्टही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *