राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात बुधवारी एका भरधाव इनोव्हा कारने ६ विद्यार्थ्यांना चिरडलं. या अपघातात ५ मुलं ठार झाली. तर जखमी आहे. मृतांध्ये दोन विद्यार्थी आणि ३ विद्यार्थींनी आहेत. हे सर्व विद्यार्थी शाळेतून घरी पायी येत होते. त्यावेळी करडा-रानीवाडा रोडवर हा अपघात झाला. या अपघातात २ मुलींचा जागेवर मृत्यू झाला. तर ३ मुलांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी ९ वी आणि १० वी मध्ये शिकत होते. या घटनेबद्दल मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे.
सर्व ६ मुलं सोबत घरी निघाली होती. यावेळी मागून भरधाव येणाऱ्या इनोव्हा कारने त्यांना त्यांना चिरडलं. यावेळी गाडीचा वेग हा १०० किलोमीटर प्रतितास इतका असेल. यामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. कार रस्त्यावरून उतरत बाजूला चालणाऱ्या मुलांना चिरडून शेतात घुसली. कारची धडक इतकी जोरात होती की दोन मुलं हे किती फूट हवेत उंच फेकली गेली आणि दूर शेतात जाऊन पडली.
अपघातात २ विद्यार्थींनी रमीला आणि रवीना यांचा जागीच मृत्यू झाला. दोघी ९ वीमध्ये शिकत होत्या. सुरेश, विक्रम आणि कमला या तीन जखमी विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होतं. पण त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. सुरेश आणि विक्रम हे दोघं ९ वीमध्ये आणि कमला १० वीत शिकत होती. तर १० वीत शिकत असलेली वीणा अपघातात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चालकाचा साथीदार ताब्यात
इनोव्हा कारमध्ये दोन जण होते. त्यातील एकाला पोलिसांनी पकडलं आहे. चालक अजूनही फरार आहे. तो जवळच्याच करजा गावातील राहणारा आहे. तो व्यसनी असल्याचं बोललं जातंय. यामुळे तोच गाडी चालवत होता, असा संशय आहे. सर्व विद्यार्थी हे दांतवाडा या सरकारी शाळेत शिकत होते. ४ वाजता शाला सुटल्यानंतर ते घरी निघाले होते. या सर्वांचे घर शाळेपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. १५ मिनिटांत ते घरी पोहोचणार होते. पण रस्त्यातच त्यांना कारने चिरडलं. अपघातात ठार झालेला विक्रम हा ४ बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. या घटनेनंतर गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली.
