दुसऱ्याचा जीव वाचवणारा आज स्वतः प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरला शहापूरमधील मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर खड्ड्यात दुचाकी आदळून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन दलातील जवानाचा मृत्यू झाला. त्याच्या घरी 1.3 वर्षाच्या दोन जुळ्या मुली आहेत. मात्र खड्ड्यामुळे जवानाचा मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना काल सकाळी शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर घडली. शहापूर सरलंबा रोडवरील बामणे गावचा 31 वर्षीय विकास लहू गोरे हा तरुण ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत होता. तो नेहमी प्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना मुंबईत नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ एका मोठ्या खड्ड्यात त्याची बुलेट दुचाकी आदळली. दुचाकीचा ताबा सुटून तो डिव्हायडरवर जोरात आपटला. यात तो गंभीर जखमी झाला, येथील नागरीकांनी जखमी अवस्थेत त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
