ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचं करोनानं निधन

परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचं आज करोनानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघ यांच्या निधनामुळं आंबेडकरी विचारांचा सच्चा पाईक व प्रबोधनाच्या चळवळीचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात‌ आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय उराशी बाळगून
प्रा. वाघ‌ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे आयुष्यभर धडपडत राहिले. या कामात येणाऱ्या संकटांना निर्भयपणे तोंड देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इतरांसाठी आधार देणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक होता. विलास वाघ यांचे सामाजिक काम चौफेर होते. जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन असे काम त्यांनी उभे केले होते. वेश्यांच्या मुलांसाठीही त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एका महाविद्यालयाचा डोलारा वाघ यांनी उभा केला होता. मराठीतील ‘सुगावा’ मासिक देखील ते चालवत होते. त्यातूनच पुढं त्यांनी सुगावा प्रकाशन सुरू केले. सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला मार्गदर्शक ठरू शकतील अशी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती.

विलास वाघ यांच्यावर सेवादलाचे संस्कार होते. समाजवादी वर्तुळात त्यांचा वावर होता. मात्र, ते स्वत:ला मूळचे आंबेडकरवादी समजत. दीन-दलित हा त्यांच्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू होता. पुणे जिल्ह्यातील भुकूम इथे दलित कुटुंबांना घेऊन त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला होता. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. त्याच्या सुगावा मासिकाला २००३ सालचा ‘इंटरनॅशनल मिशन कॅनडा’ हा पुरस्कार मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *