जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हसनाबाद परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा मोठा तडाखा बसला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हसनाबाद परिसरात आज सायंकाळपासून अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी तुफान गारपीटही झाली. त्यामुळे गारांचा प्रचंड खच पडला व परिसरातील शेतात व अन्य भागांत पांढराशुभ्र बर्फाच्छादित थर तयार झाला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील हसनाबाद, तळेगाव, पिंप्री, विटा, रजाळा, कोपर्डा, राजूर, तपोवन या गावांसह तालुक्यातील देहेड, कोदोली आदी गावांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आहे.
अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतात सोंगणी करून ठेवलेला गहू, हरभरा, ज्वारी, कांदा सिडसह आंबा फळांचं अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. सध्या करोना संसर्गाचा कहर चालू असून काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्यामुळे तालुक्यात काही गावात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असताना पुन्हा आलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदील झाला आहे. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, नागपूर तसेच विदर्भातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
