राज्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यासह परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, बीड, रायगड अशा सात जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण कायदा, २००९ नुसार ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव आढळून आलेल्या भागापासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र (इन्फेक्टेड झोन) आणि दहा किलोमीटर परिसर देखरेख क्षेत्र (सर्व्हेलन्स झोन) घोषित करण्यात आले आहेत. राज्यभरात बाधित भागांतील सुमारे २५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत, असेही पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात रविवारी ७४५ कोंबड्या दगावल्या आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वडगाव घेणंद (ता. खेड), आळंदी म्हातोबा (ता. हवेली), रुई (ता. इंदापूर) या गावांमध्ये कोंबड्यांच्या मृत्यूची नोंद आहे. याशिवाय राज्यात ३२ बगळे, चिमण्या, पोपट आणि ५९ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग निदान संस्थेच्या प्रयोगशाळेकडे आणि पुण्यातील पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांत एकूण पाच हजार ९८७ पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे विभागातर्फे सांगण्यात आले.
