श्रावण महिन्यातील शुक्रवारी शक्यतो पुरण केले जाते. या दिवशी मुलांना वाण म्हणून ‘आरत्या’ किंवा ‘मुरण्या’ देतात. आरत्या म्हणजे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेया पुऱ्या. तर मुरण्या म्हणजे पिकलेल्या केळ्यात रवा, गूळ, खोबरे घालून तळलेले छोटे गोळे.
शुक्रवारी उपवास सोडताना विविध पक्वान्नं केली जातात. त्यासाठी नेवऱ्या, नारळाच्या रसातली अळुवडी, तांदळाची खीर, नारळाच्या दुधातील शेवया, सांजाच्या पोळ्या, असे अनेक पदार्थ घरोघरी बनतात. प्रांतांनुसार या पदार्थांमध्ये विविधता दिसते. शुक्रवारी जिवतीपूजन केले जाते. लहान मुले आणि सवाष्ण महिलांना चणे आणि वेलची, केशरयुक्त दूध दिले जाते. शुक्रवारी केला जाणार एक प्रकार म्हणेज घावन- घाटलं…
घावन घाटल्याचा नैवेद्य कोकणात दाखवतात. पक्वान्न म्हणून इतर वेळेस वाढायचे असेल, तर त्यात केशर, काजू, बदामाचे काप व बेदाणेही घालता येतात. यात ओले खोबरे अवश्य घालावे. त्याशिवाय चव येणार नाही.
घाटल्यासाठी : – प्रथम पातेल्यात पाणी घ्यावे. अर्धी वाटी पाणी दुसऱ्या भंड्यात घेऊन त्यात तांदळाचे पीठ घालून चमच्याने चांगले ढवळावे. पातेल्यातील पाणी चांगले गरम झाले की त्यात चिमूटभर मीठ, गूळ, ओले खोबरे घालून चमच्याने ढवळावे. त्यानंतर तांदळाचे पीठ पाण्यात कालवून घेऊन एका हाताने त्याची धार पातेल्यातील पाण्यात धरून, त्याच वेळेस दुसऱ्या हाताने ढवळतही राहा. पीठ चांगले शिजले की वरती साय धरते. गॅस बंद करून त्यात मस्त वेलचीपूड घाला. वर अर्धे झाकले जाईल, असे झाकण पातेल्यावर ठेवावे. मधून मधून घाटले ढवळावे. ऐनवेळी पक्वान्न करायची वेळ आली तरी उपलब्ध साहित्यात हे सहज करता येते आण वेगळेपणामुळे सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. पण तो गरमागरम खाण्यातच मजा आहे…

