श्रावण हा महिना जसा सणउत्सवांचा तसाच तो व्रतवैकल्यांचाही. त्यामुळे उपवास तर आलेच. आता त्यादिवशी नेमकं काय खावं, हा प्रश्न पडतो. फळं खावीत की इतर काही पदार्थ की खरोखरच उपाशी राहावं? कारण उपवासादरम्यान चुकीचं खाणं खाल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होताना दिसतो. त्यासाठीच या काही खास टिप्स…
भारतीय संस्कृतीत उपवासाला खूप महत्त्व आहे. धार्मिक व्रतवैकल्य आणि उपवास यांची सांगड पूर्वीपासून घातली गेली आहे. त्यामुळे श्रावणासारख्या व्रतवैकल्यांच्या महिन्यात उपवासही भरपूर असतात. शास्त्रांनुसार उपवास म्हणजे लंघन. लंघन याचा अर्थ पचनक्रियेस आराम देणं. यामुळे शरीरास होणारा फायदा म्हणजे पचन सुधारतं, हलकेपणा येतो आणि पर्यायानं उत्साह येतो. हेच साबुदाणा आणि त्याचे पदार्थ (दाण्याचा भरपूर कूट घालून केलेले), तळलेले पदार्थ जसे वेफर्स, वडे इ. खाऊन चुकीच्या पद्धतीनं केलेल्या उपवासामुळे उष्णता, आम्लपित्त वाढणं, पोट बिघडणं, उलट्या होणं असे त्रास होतात. मग उपवास नेमका कसा करावा?
उपवासाच्या आदल्या दिवशी रोजचा समतोल आहार घ्या. उपवासादिवशी पचण्यास जड पदार्थ जसे साबुदाणा वडा, खिचडी, बटाटा वा केळ्याचे वेफर्स इ पदार्थ खाऊ नये. या पदार्थांऐवजी राजगिरा पीठ, लाह्या, शिंगाड्याचं पिठ, वरई तांदूळ किंवा त्याचं पीठ, रताळं किंवा या सर्व पदार्थांची भाजणीपासून बनवलेले पदार्थ दिवसभरात थोडे थोडे खावेत. काकडी, लाल भोपळा याची भाजी, कोशिंबीर किंवा रायतं करून खावं. ताजं, गोड दही, ताक, मठ्ठा घ्यावा. फळं आणि सुकामेवा यांचा वापर करावा. असे पदार्थ प्रमाणात आणि विभागून खाल्ल्यानं उपवासादिवशी ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. शिवाय यानं उष्णता आणि पित्तही होत नाही. खाण्याबरोबरच व्यायामाच्या बाबतीतही विशेष काळजी घ्या. जास्त तीव्रतेचा व्यायाम करू नका किंवा योग्य मार्गदर्शनाखाली, योग्य बदलांनुसार करा. उपवास सोडतानाही पचण्यास हलके पदार्थ खावेत. उदा. भाज्यांचं सूप + मूगखिचडी, मऊ भात + मुगाचं वरण, गहू + मूगडाळ यांच्या भाजणीचं थालीपीठ इ. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. उपवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यायामाआधी आणि व्यायामादरम्यान उत्तम, दीर्घकाळ ऊर्जा देणारे पेय, जसे दूध + फळ = मिल्कशेक, दही + फळाचा गर = योगर्ट, सोयामिल्क + सुकामेवा = शेक इ. घ्यावेत.
व्यायामानंतरही अर्धा ते एक तासामध्ये योग्य आणि समतोल आहार घ्या.वरील सर्व गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या तेवढंच हे लक्षात घ्या, की तुम्हाला मधुमेह, उच्च वा कमी रक्तदाब असेल, तर किंवा गरोदर आणि स्तनपान देणारी स्त्री, वयोवृद्धांनी शक्यतो उपवास करू नये.

