कर्जत तालुक्यातील चिलवडी या गावात रविवारी जगताप आणि राऊत यांच्यात लग्नसमारंभ होता. मुलगी चिलवडीची आणि नवरदेव भूम (जि. उस्मानाबाद) येथील. दुपारची वेळ होती. वरात आणि अन्य सोपस्कार पूर्ण होऊन लग्न विधीला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील पद्धतीनुसार शेवटच्या मंगलाष्टकापूर्वी थांबून उपस्थित मान्यनरांची आशीर्वादपर भाषणे झाली. ती संपून पुन्हा मंगलाष्टक सुरू होताच नवरदेवाला चक्कर आली. तो एकदम कोसळलाच. त्याला उचलून तातडीने राशीन येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात येण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील सोपस्कार आणि शवविच्छेदन करण्यात आले. नवरदेवाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे आढळून आले.
या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने असली तरी लग्नसमारंभ जोरात होत आहेत. या लग्नातही डीजे लावण्यात आला होता, त्याच्यापुढे नवरदेवाच्या मित्रमंडळींनी जोरदार नृत्य केले. काही काळ नवदेवही त्यांच्यात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते.

