ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

कोरोना व्हायरसचा Coroanavirus प्रादुर्भाव वाढल्यामुळे ठाणे शहर २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी लॉकडाउन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

२ जुलै ते १२ जुलै या कालावधीपुरता हा लॉकडाउन असेल. या कालावधीत बाजारपेठा पूर्णपणे बंद असतील. नागरिकांना मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. यापूर्वी स्थानिक प्रशासनाने उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाउन जाहीर केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील, असे सांगितले होते. काही भागातील अधिकारी पुन्हा लॉकडाऊन करण्याची परवानगी मागत आहेत. माझी तशी इच्छा नसली तरी वेळ पडल्यास संबंधित परिसर लॉकडाऊन करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

त्यामुळे आता ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी तसे संकेतही दिले होते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी संसर्ग वाढला आहे. या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *