उल्हासनगरात इमारतीचा पाया खचला

उल्हासनगर येथील कॅम्प नंबर १ परिसरात असलेल्या सूरज अपार्टमेंट या पाच मजल्यांच्या इमारतीचा पाया मंगळवारी दुपारी अचानक खचला. त्यामुळे या इमारतीतील नागरिकांमध्ये खळबळ उडाली, अखेर महापालिकेने ही धोकादायक इमारत रिकामी करून सील केली. मात्र, देशभरात लॉकडाऊन लागू असताना या इमारतीतील २२ कुटुंबांचे छत्र हरवल्याने ते बेघर झाले आहेत. तर, या इमारतीतील सर्व कुटुंबांची महापालिकेने निवाराकक्षात तात्पुरती व्यवस्था केल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची संख्या दरवर्षी वाढत आहे. धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्याही अनेक इमारती कोसळत असून, दरवर्षी अशा अपघातांमध्ये मोठी जीविनहानी होते. त्यामुळे शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींबाबत प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून लागू असलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे ही प्रक्रियाही ठप्प झाली आहे. तोच मंगळवारी उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील रामजपो आश्रम या परिसरातील सूरज अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा अतिशय जर्जर अवस्थेतील पाया अचानक खचला. ही बाब इमारतीतील रहिवाशांच्या निदर्शनास येतात एकच खळबळ उडाली. या इमारतीचा परिसर अतिशय वर्दळीचा असून चारही बाजूंनी इमारती आणि घरे आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्येही भीती आहे. अखेर याबाबत महापालिकेला माहिती मिळाली असता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, सर्व रहिवाशांना बाहेर काढून इमारत सील केली. मात्र, लॉकडाऊन लागू असताना या इमारतीतील २२ कुटुंबे अचानक बेघर झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. सध्या या सर्व कुटुंबांच्या निवासाची सोय महापालिकेने निवाराकक्षात केली आहे. मात्र, अनेक कुटुंबांनी या निवाराकक्षात राहण्यास नकार देत महत्त्वाचे सामान घेऊन आपापल्या नातेवाईकांकडे आधार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *