नवी मुंबईतील कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधून मुंबई आणि उपनगरात २० मार्चपासून १६ एप्रिलपर्यंत चार लाख ६२ हजार ५४० क्विंटल धान्याचा साठा पोहोचला आहे. मात्र, असे असतानाही किरकोळ बाजारात मात्र अन्नधान्याचा तुटवडा भासत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्य किरकोळ बाजारात पोहचूनही किराणा दुकानात मात्र अन्नधण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे मुंबईतून हा साठा कुठे गायब झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. धान्यचा मोठा साठा असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात आहे का, असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.
बाजार समितीच्या आकडेवारीनुसार, वाशीतील घाऊक बाजारामध्ये सध्या तीन लाख ४० हजार ६५६ क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्यसाठा शिल्लक आहे. मुंबई आणि उपनगरांना सरासरी दोन महिन्याला एकूण नऊ लाख तीन हजार १९६ क्विंटल धान्याचा साठा सहज पुरू शकतो. सध्या साडे चार लाख क्विंटल अन्नधान्य एका महिन्यात मुंबईत गेले असतानाही किराणा मालाच्या दुकानांत मात्र अन्नधान्याची टंचाई जाणवत आहे आणि दरातही वाढ झाली आहे. मात्र ही कृत्रिम टंचाई दाखवून भाववाढ करण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका यामुळे अनेक घटकांकडून निर्माण केली जात आहे. सरकारने सातत्याने छापे टाकल्यानंतर हा लपवून ठेवलेला माल बाहेर निघू शकतो, अशी शक्यताही यानिमित्ताने बाजार समिती वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
वाशीतील धान्य बाजारातूनच मुंबई आणि उपनगरांना अन्नधान्यचा पुरवठा केला जात आहे. अन्नधान्यच्या गाड्या थेट मुंबईत जाऊ शकत नाही. त्यामुळे हे बाजार धान्य बाजार बंद करून मुंबईचा अन्नधान्याचा पुरवठा थांबवून कृत्रिम भाववाढ केली जाऊ शकते. त्यामुळे अन्नधान्याचे बाजार बंद ठेवू नये, अशी मागणी बाजार समिती घटकांकडून केली जात आहे.
कृत्रिम दरवाढ
डाळींच्या घाऊक आणि किरकोळ दरांत मोठी तफावत पाहायला मिळत आहे. यावरून ही भाववाढ कृत्रिम असल्याचेच स्पष्ट होत आहे.
डाळी घाऊक किरकोळ
तूरडाळ ९०रु. किलो १४०
मूगडाळ मुगडाळ १०५ १६०
चणाडाळ ६५ ९०
मुंबईत बऱ्याच प्रमाणात मालाचा पुरवठा झालेला आहे. असे असतानाही टंचाई भासत असेल, तर त्याचा शोध घेण्याची गरज आहे. अनेक लोक मुंबईत नाहीत. हॉटेल बंद आहेत. धान्य बाजारातील दर हे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. आताचे दर पाहता दरवर्षीप्रमाणे १० ते १५ टक्के दरवाढ आहे ती नियमित आहे. मात्र, किरकोळमध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढण्याच्या तक्रारी येत आहेत. पण त्यावर बाजार समितीचे नियंत्रण नाही आहे.
