फिलिपिन्समध्ये ७० विद्यार्थी

वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले राज्यातील सुमारे ७० विद्यार्थी अद्याप फिलिपिन्समध्ये अडकले आहेत. आपली सुटका व्हावी यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आर्ज केले आहे; तसेच त्यांचे पालकही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘करोना’चा प्रादुर्भाव झाल्यानंतर परदेशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे मोठे काम भारत सरकारने केले. मात्र, फिलिपिन्सकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. येथेही सुमारे ५००हून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. त्यापैकी ७० विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. फिलिपिन्समध्येही लॉकडाऊन करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना कोठेही जाण्याची मुभा नाही; तसेच, त्यांच्याकडे अन्न-धान्याचीही साठवणूक नाही. तेथे पिण्याचे पाणी पुरविणाऱ्यांनी आता ती सेवा बंद करण्याचे विद्यार्थ्यांना सांगितल्याने ते घाबरले आहेत. सध्या तेथील एका गुरुद्वारातील लंगरमध्ये विद्यार्थी भोजन घेत आहेत. आता देशाने आंतरराष्ट्रीय सीमाही बंद केल्याने मायदेशी परत कसे जायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

‘या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधून प्रयत्न करावेत,’ अशी मागणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक व तेथे अडकलेल्या एका विद्यार्थिनीचे वडील संतोष सोनावणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *