दिल्लीत २४ तासात एकही नवा रुग्ण नाही

भारतासह संपूर्ण जग सध्या जीवघेण्या करोना व्हायरसचा सामना करत आहे. भारतात केंद्र आणि राज्य सरकारने करोनाशी दोन हात करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या दरम्यानच राजधानी दिल्लीतून दिलासादायक बातमी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय ५ जणांना यशस्वी उपचार करुन सोडण्यात आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ही दिलासादायक माहिती दिली. ते म्हणाले, ‘गेल्या २४ तासात दिल्लीत एकही रुग्ण आढळलेला नाही. ५ जण उपचार करुन गेले आहेत. आत्ताच आनंद साजरा करायचा नाही. आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ द्यायची नाही. आता तुमच्या सहकार्याची गरज आहे.’

देशात सध्या करोनाबाधितांची संख्या ५११ वर पोहोचली आहे, तर १० जणांचा मृत्यूही झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनीही गर्दी कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दिल्ली मेट्रोची सेवाही स्थगित आहे, तर जमावबंदी अगोदरपासूनच लागू करण्यात आली आहे. दिल्लीत ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई आहे.

मुंबईतील १२ रुग्णांची करोनावर मात

राज्यसरकार आणि डॉक्टरांनी सुरू केलेल्या करोनाविरुद्धच्या युद्धाला पहिलं यश मिळालं आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेले १२ जण करोनामुक्त झाले आहेत. या १२ रुग्णांची दुसरी करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयासह पालिकेच्या विविध रुग्णालांमध्ये एकूण ३७ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी १२ रुग्णांची सेकंड करोना टेस्ट घेण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. करोना रोग बरा होत असल्याचं हे लक्षण आहे, असं पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं. इतर करोना रुग्णांमध्ये करोनाचे लक्षणं सौम्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *