एसीचा वापर टाळा; राज्य सरकारच्या शासकीय कार्यालयांना सूचना

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसीचा (वातानुकुलित यंत्र) वापर बंद करा किंवा कमीत कमी एसीचा वापर करा, अशा सूचना राज्य सरकारने सर्व शासकीय अस्थापनांना दिल्या आहेत.

राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयांना तसे आदेश दिले आहेत. करोनाची लागण शिंकणे किंवा खोकल्यातून होत असते. शिंकण्याने किंवा खोकल्याने करोनाचे विषाणू हवेत पसरतात. तसेच हवेतील धुळीकणांसोबत हे विषाणू विविध वस्तुंच्या पृष्ठभागावर स्थिरावतात. एसी सुरू असल्यास हे विषाणू अधिक काळ जिवंत राहतात. एसीमध्ये तापमान कमी असल्याने विषाणू मरत नाहीत. तापमान जास्त असेल तर विषाणू मरतात. त्यामुळे सर्व कार्यालयात एसीचा कमीत कमी वापर करा, गरजे पुरताच एसी सुरू करा किंवा एसी बंद ठेवा. त्याऐवजी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. तसेच आपल्या अख्त्यारित येणाऱ्या सर्व कार्यालयांनाही तशा सूचना द्या, असे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यानेही करोना रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. श्वसन संस्थेचा विकार असलेल्या व्यक्तिंशी संपर्क न ठेवणे, शिंकताना किंवा खोकताना नाकावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवणे, वारंवार हात धुणे, अर्धवट शिजलेले कच्चे मांस न खाणे आणि फळ, भाज्या स्वच्छ धुऊन खाणे आदी सूचना आरोग्य खात्याने नागरिकांना केल्या आहेत.

दरम्यान, देशातली करोना रुग्णांची संख्या २००वर पोहोचली असून महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली आहे. राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *