ठाण्यातील २७२ जण घरीच विलग

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बुधवारी सायंकाळपर्यंत सुमारे २९४ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २७२ जणांना कोणाच्याही संपर्कात न येता घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

बुधवारी दिवसभरात १२४ जणांची तपासणी झाली. त्यापैकी ६९ परदेशी प्रवास केलेल्या व्यक्ती आणि ५५ त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. त्यापैकी १२३ जणांना घरच्या घरी विलग ठेवण्यात आले आहे. तर एकाला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यातील दोन रुग्ण सध्या कस्तुरबामध्ये दाखल आहेत. यापूर्वी दाखल असलेल्यांपैकी २० जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांचा माग काढला जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांना उपचाराच्या सूचना दिल्या जात आहेत. यापूर्वी ठाण्यात १७० जणांची तपासणी झाली होती. त्यामध्ये बुधवारी १२४ जणांची भर पडली असून आत्तापर्यंत २९४ जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी १९८ प्रत्यक्ष प्रवास केलेल्या व्यक्ती आणि ९६ त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचा समावेश आहे. मंगळवारपर्यंत १४७ जणांना घरी थांबण्यास सांगण्यात आले होते. बुधवारी त्यामध्ये १२३ जणांची वाढ झाली असून ठाणे शहरातील २७२ जणांचे घरच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *