महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बारी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पाच हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे.
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. ट्रेकिंगचा छंद असलेल्या हजारो पर्यटकांची इथे रेलचेल असते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असून नगर येथे सुद्धा रुग्ण आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी कळसूबाई शिखर काही दिवस बंद राहणार आहे.
शिखराच्या पायथ्याशी याबाबतची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. पर्यटकांनी सूचनेचे पालन करावे. कळसुबाई शिखरावर जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच बारी गावात येण्याचा प्रयत्न करू नये. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास पाच हजाराचा दंड करण्यात येईल, असं फलकावर स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
