कोल्हापूर शहरातील मटण दरवाढ विरोधातील आंदोलन गाजत असताना बकऱ्यांच्या चोऱ्या होऊ लागल्याने त्याची खुमासदार चर्चा रंगली होती. हा विषय अजूनही चर्चेत असताना आता डुकरांच्या चोरीचे प्रकरण पुढे आले आहे.
चंदगड तालुक्यातील खामदळे या गावातून तब्बल ८० पाळीव डुकरांची चोरी झाली असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार सचिन पाटील यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
खामदळे या गावामध्ये सचिन पाटील यांनी वराह पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. गोवा राज्याच्या सीमेलगत असलेल्या या गावात त्यांचा हा व्यवसाय आहे. त्यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांनी ‘पिग फार्म’ उभारले आहे. त्याध्ये ‘यॉकशार’ जातीची सुमारे शंभर डुकरं पाळली आहेत.
त्यापैकी आणि ८० डुकरे अज्ञातांनी चोरून नेली आहेत. भिंतीला असणारी जाळी उचकटून चोरट्यांनी ही डुकरं चोरल्याची तक्रार पाटील यांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्यांना शोधणाऱ्या पोलीस यंत्रणेसमोर आता ही ८० डुकरं शोधण्याचे आव्हान आहे. कोल्हापुरातील बकरी चोर पकडला त्याप्रमाणे कदाचित ते या ही शोधात बाजी मारतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
