बोर्डाची परीक्षा टाळण्यासाठी शिक्षकानंच विद्यार्थिनीला किटकनाशक दिलं

शिरोळ तालुक्यातील शिरटी हायस्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या सानिका माळी या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. नीलेश बाळू प्रधाने या शिक्षकानंच तिला किटकनाशक दिलं होतं. तिची परीक्षेची तयारी झाली नव्हती. त्यामुळं परीक्षा टाळता यावी यासाठी प्रधाने यानं तिला किटकनाशक दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाण्यातून विषबाधा झाल्यानं सानिका माळी या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या पाण्याच्या बाटलीत विष आलं कुठून? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित करून संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, ‘नीलेश बाळू प्रधाने यानं तिला किटकनाशक दिलं होतं. ती ते पाण्यात मिसळून प्यायली. किटकनाशक प्यायल्याने आजारी पडून परीक्षा टाळता येईल, असं तिला वाटलं होतं. कारण तिची परीक्षेची तयारी झाली नव्हती.’

या प्रकरणी संशयित आरोपी शिक्षक प्रधाने याला अटक करण्यात आली होती. सानिकाला आपणच किटकनाशक दिल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोर्टानं प्रधाने याला सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. २० फेब्रुवारीला सानिका शाळेत गेली होती. प्रात्यक्षिक परीक्षा होती. त्याचवेळी तिला अस्वस्थ वाटू लागलं. तिला तात्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. २५ फेब्रुवारीला उपचार सुरू असताना, तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, तपास सुरू केला. त्यांनी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींकडे चौकशी केली. त्यानंतर प्रधाने याला अटक केली. सानिकानं मागितल्यानंतर मी तिला किटकनाशक दिलं अशी कबुली त्यानं दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रधानेनं हे कृत्य का केलं? किंवा त्यानं सानिकाला एखाद्या समुपदेशकांकडे का नेलं नाही, याची चौकशी ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *