यूपीतील ओलीसनाट्य संपले; आरोपीचा खात्मा करून २० मुलांची सुटका

उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या २० लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान एनएसजी कमांडोंशी झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम मारला गेला आहे. तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.

कानपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी बाथम मारला गेल्याचं घोषित केलं. या कारवाईत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाले आहेत. आरोपीच्या घरातून एक रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी बाथमच्या घरावर दगडफेकही केली. या दगडफेकीत त्याच्या घराचा दरवाजा तुटला. हीच संधी साधून पोलिसांनी कारवाई केली. ‘मुलांच्या सुटकेची कारवाई तब्बल ८ तास चालली. पोलिसांनी सातत्यानं आरोपीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांच्या मदतीनं त्याला समजावून पाहिलं. मात्र, त्यानं पोलिसांचं आवाहन धुडकावून लावलं, अशी माहिती यूपीचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली.

याउलट आरोपीनं पोलिसांवर देशी बनावटीच्या पिस्तूलातून गोळीबार केला. त्याशिवाय त्यानं बॉम्बफेक देखील केली. या बॉम्बफेकीत घराजवळील एक भिंत ढासळली. तसंच, काही पोलीस जखमी झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं एनएसजी कमांडोंच्या पथकाची मदत मागितली. काही वेळातच एनएसजीचं पथक घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई करण्यात आली.

मोहम्मदाबादमधील करसिया गावामध्ये आरोपी बाथम याचे घर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यानं आपल्या एका नातेवाईकाचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो तुरुंगातही गेला. एक वर्षापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्याला एक १० वर्षाची मुलगीदेखील आहे. गुरुवारी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावलं होतं. सगळी मुलं दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषनं घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं तिला कळालं. तिनं तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

मी तुरुंगात असताना गावातील काही लोकांनी माझ्या पत्नीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी त्या आरोपींना समोर आणावं, अशी त्याची मागणी होती. तसंच, सरकारी योजनेतून त्याला घर आणि शौचालय बनवून हवं होतं. मात्र, त्यावर कुठलीच कार्यवाही होत नव्हती. या साऱ्यामुळं नैराश्य आलेल्या बाथमनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *