महाविकासआघाडी सरकारच्या १० रुपयात थाळीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज पडणार आहे. तसेच ही थाळी खाणार्यांचा फोटोही काढला जाणार आहे. समाजातील गरीब वर्गासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यात ही योजना सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ ठिकाणांचा समावेश असेल. १० रुपयात थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून शहरी भागात ३५ रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाणार आहे.
पण ही योजना राबवताना बोगस लाभार्थी दाखवले जाऊ नयेत यासाठी राज्य सरकारकडून आधार कार्ड आणि फोटो काढण्याची अट टाकण्यात आली आहे. यापूर्वी युती सरकार असताना शिवसेनेच्या संकल्पनेतून १ रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आली होती. शिवसेनेच्या संकल्पनेतूनच १० रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे.
