साई जन्मस्थळाचा वाद; रविवारपासून शिर्डी बंदची घोषणा

साईबाबा जन्मस्थळाचा वाद उकरून काढणाऱ्या मराठवाड्यातील पाथरी ग्रामस्थांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी संतप्त शिर्डीकरांनी येत्या रविवारीपासून शिर्डी बंदची हाक दिली आहे. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी तातडीची ग्रामसभा बोलावली होती. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले असून शिर्डी ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ माजली आहे तसंच शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.

साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचा दावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. जगाला सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली .आपला धर्म ,पंथ ,जन्म याबाबत कोठेही वाच्छता केली नाही . साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल साईसतचरित्र हेच एकमेव दस्तावेज असून त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही. असे असतानाही पाथरी येथील काही प्रवृत्ति साईबाबा विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कडे साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्याचा आक्षेप साईभक्त शिर्डीकरांनी घेतला आहे.

साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणा-या पाथरी आणि अन्य ठिकाणच्या तथाकथित लोकांचा तीव्र निषेध करुन यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणा-यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवारपासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबधी शनिवारी पुन्हा ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

या बैठकीला नगराध्यक्ष अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, नितीन कोते, सुजित गोंदकर, गणीभाई पठाण, जमादार इनामदार उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे साईभक्त आहेत, त्यांना कोणी तरी चुकीची माहिती दिल्याने असा उल्लेख झाला असावा, असेही शिर्डीकरांचे मत आहे, त्यासाठी ठाकरे यांची भेट घेण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *