सायन रुग्णालयाला १६ रुपयांनी कांदे

कांद्याच्या वाढत्या भावाने सर्वसामान्य माणसाला रडवले असताना मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील रुग्णांना पथ्याहारासाठी कंत्राटदाराने हा महागडा कांदा फक्त १६.२९ रुपये प्रतिकिलो भावाने पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. तेही जवळजवळ ३५ हजार किलो कांदे हा कंत्राटदार पुरवणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

पालिकेने सायन रुग्णालयातील आंतररुग्णांना पुढील वर्षभरासाठी पथ्याहार म्हणजे फळे आणि भाजीपाला यांचा हजारो किलोचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यास दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. मे. ए. ए. एम. चेरुवत्तम आणि मे. तेजसन्स फूड्स प्रा. लि. यांनी काही ठरावीक बाबींचे भाव थोडेसे जास्त भरले. मात्र सध्या कांद्याचा बाजारभाव हा १०० ते १२० रुपये किलो इतका भडकला असताना मे. तेजसन्स फूड्स या कंत्राटदाराने एक किलो कांदा फक्त १६.२९ रुपये भावाने पुरवठा करणार असल्याचे निविदेत म्हटले आहे.

पुढील वर्षभरासाठी म्हणजे ३ जानेवारी २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत तब्बल ३५ हजार किलो कांद्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी कंत्राटदाराने घेतली आहे. कांद्याचा भडकलेला बाजारभाव लक्षात घेता आणखी काही दिवस तरी कांदा स्वस्त होणार नाही. तर हा कंत्राटदार इतक्या कमी दरात कांदा कसा पुरवणार, त्याचा दर्जा कसा असणार याबाबत अधिकाऱ्यांच्या शंका निर्माण झाल्या आहेत. स्वस्त भावातील हा कांदा वेळेत पुरवला गेला नाहीतर त्याचा परिणाम रुग्णांच्या पथ्याहारावर होण्याची शक्यता असल्याने कंत्राटदाराच्या कांद्याचा दर्जा तपासणे खूपच महत्त्वाचे असणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांद्याचा भाव मागील सुमारे दोन महिन्यांपासून कडाडला आहे. भाव वाढण्याच्या आसपासच भाजीपाला व फळभाज्याखरेदीच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदारांना वाढत्या भावाची माहिती असणार, हे अपेक्षित धरूनच त्यांनी निविदा भरल्या असाव्यात. प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीला येईल, तोपर्यंत कदाचित वाढत्या भावाची माहिती प्रशासनाला देईल, असा आमचा अंदाज आहे. अन्यथा कंत्राटदाराला हा भाव परवडत, असे गृहीत धरून प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय स्थायी समिती घेऊ शकते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वस्त भावात परवडते कसे?

फक्त कांदाचे नव्हे तर इतर भाजीपाला आणि फळभाज्यांचे भावही या दोन्ही कंत्राटदारांनी तुलनेने कमी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजीपाला आणि फळभाज्यांचा बाजारात ४० ते ६० रुपये किलो भाव असताना भाजीपाला, फळभाजीचा पुरवठा अर्ध्यापेक्षाही कमी दरात देण्यास तयार झाल्याने त्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस, भाजप घेणार आक्षेप

खरेदीत एकूण ६२ वस्तूंचा पुरवठा दोन्ही कंत्राटदार करणार आहेत. भावातील मोठी तफावत पाहता भाजप, काँग्रेस यांच्याकडून या प्रस्तावाबाबत आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

भाजी बाजारभाव कंत्राटदाराचा भाव (रु.)

वांगी ४० ७. ४५

कोबी ४० ९.१०

बटाटे ३० १५.५०

सिमला मिर्ची ६० १६.९०

फ्लॉवर ६० १४.४९

भेंडी ६० १७.९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *